
मुंबई प्रतिनिधी
फडवणीस सरकारने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आज पुन्हा
राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली
दरम्यान, धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. स्वतंत्रपणे त्यांचा नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.