मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए (MMRDA) करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थितीत होते. या बैठकीत १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिवांसह एमएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएसआरडीसीचे संबंधीत अधिकारी उपस्थितीत होते. मंत्री आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
आशिष शेलार म्हणाले की, ‘आमचे स्थानिक आमदार कालिदास कोळबंकर यांच्या ही सूचना आणि रहिवाशांच्या शिष्टमंडळाने केलेल्या सूचनेनुसार एल्फिन्स्टन पुलाचे कामात एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या. पण सरकारने नवीन नियोजन केल्यानं केवळ २ इमारती बाधित होणार आहेत. त्यामुळे सरकारचे आभार. आता या पुलाचे काम सुरु होताना स्थानिक नागरिक विरोध करत आहेत की, त्यांच्या मनात भिती आहे. पुलाचे काम करताना १७ इमारतींना धोका निर्माण होईल. त्यामुळे या सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता ३३(९) अंतर्गत एमएमआरडीएनेच करावा’, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आणि ती विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.
‘त्यामुळे ज्या दोन इमारतीमधील रहिवाशांची घरे बाधित होणार आहेत, त्यांना कुर्ला येथे घरे अथवा मोबदला देण्याऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकासीत घरे देण्यात यावीत’, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हे मान्य करत दोन इमारतीमधील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबीर म्हणून तात्पुरती घरं देण्यात येतील. अन्य १७ इमारतीच्या पुनर्विकास करताना बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना त्याच ठिकाणीच घरे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


