
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : परळ येथील ए. जलिचंद ज्वेलर्स शॉपमधून तब्बल ४ कोटी ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरी करणाऱ्या तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७० टक्के चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मालमत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहापर्यंत ही घटना घडली. शॉपमध्ये काम करणारा जितु नवाराम चौधरी (२३, रा. राजस्थान) यानेच दागिने व रोकड लंपास केल्याचे तपासात निष्पन्न झाले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विशेष पथक राजस्थानला पाठवले. गुन्हे शाखा, कक्ष ४ नेही समांतर तपास केला. तांत्रिक तपास व गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी जितुसह त्याचे दोन साथीदारांना अटक केली.
अटक आरोपी म्हणजे जितु नवाराम चौधरी (२३, सादडा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान), कमलेश वाघाराम चौधरी (२६, न्यू आबादी, भंडारवाजव, कुडाळा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) आणि भरतकुमार ओटाराम चौधरी (३८, जुनी मोहिला वास, कुडाळा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) अशी आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्य नारायण चौधरी व लखमी गौतम, अपर आयुक्त विक्रम देशमाने व शैलेश बलकवडे, उपायुक्त रागसुधा आर. व राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक घन:शाम पलंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन महाडीक यांच्यासह गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.
या धाडसी कारवाईमुळे व्यापारी व ज्वेलर्समध्ये दिलासा व्यक्त होत असून पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.