
मुंबई प्रतिनिधी
सायबर फसवणुकीच्या घटनांनी हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा देणारी कारवाई मुंबई पोलिसांनी हाती घेतली आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या एका भल्यामोठ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल १२ जणांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाले की या टोळीने देशभरातील निष्पाप नागरिकांना जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. यासाठी आरोपींनी ९४३ बनावट बँक खाती उघडली होती. त्यापैकी १८१ खाती मुंबईत सक्रिय वापरात होती. पोलिसांनी केलेल्या धाडीतून दोन लॅपटॉप, २५ मोबाईल फोन, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड तसेच तब्बल १०४ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.
१९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर दाखल झालेल्या शेकडो तक्रारींवरून तपासाचा धागा सापडला. त्यातून डिजिटल अटक, बनावट ऑनलाइन शॉपिंग, बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग अशा प्रकारांनी या टोळीने सामान्य जनतेला लुटल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
मुंबईतून सुरू झालेला हा तपास सध्या देशातील इतर राज्यांत पोहोचला असून, या रॅकेटमागे कार्यरत असलेला मोठा आंतरराष्ट्रीय गट पोलिसांच्या रडारवर आला आहे.