
वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या मतदारसंघात सोमवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एक महिला तिच्या दोन चिमुरड्यांसमोर झाडाला बांधून निर्दयपणे मारहाण करण्यात आली. केवळ पतीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे ही संतापजनक अमानुषता घडल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे.
पीडित महिला सिरिशा (२८) ही रोजंदारीवर काम करणारी मजूर असून तिचा पती तिमप्पा याने गावातील तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्या एस. मनिकप्पाकडून दोन वर्षांपूर्वी ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीस तिमप्पाने हप्त्याने पैसे फेडले. मात्र काही काळापूर्वी तो बंगळुरूला स्थलांतरित झाला आणि त्यानंतर पैशांची परतफेड थांबली.
याचा राग मनात धरून मनिकप्पाने सोमवारी गावातच सिरीशाला तिच्या घरातून फरफटत बाहेर ओढले. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांसमोरच झाडाला बांधून तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर मनिकप्पाची पत्नी आणि इतर नातेवाईकांनीही सिरिशावर हात साफ केला. हा धक्कादायक प्रकार पाहून दोन्ही मुलं भयभीत झाली आणि गावकऱ्यांनी आरडाओरडा करत पोलिसांना पाचारण केलं.
घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मनिकप्पा, त्याची पत्नी आणि अन्य नातेवाईकांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३४१, ३२३, ३२४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
A woman was tied to a tree after her husband failed to repay the loan, in CM Chandrababu Naidu's constituency #Kuppam in Chittoor district, AndhraPradesh.
After getting information, the Kuppam Police reached Narayanapuram and freed Sirisha.
A case has been registered. pic.twitter.com/8avhyyy85Z
— SriLakshmi Muttevi (@SriLakshmi_10) June 17, 2025
सिरिशा आणि तिचा परिवार सध्या बंगळुरू येथे वास्तव्य करत होते. मात्र सोमवारी ती मुलांच्या शाळेतील कागदपत्रांसाठी गावात आली होती. हीच संधी साधून मनिकप्पाने हा अत्याचार केला, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.
विरोधकांचे सरकारवर जोरदार टीकेचे बाण
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुप्पम मंडलमध्ये अशी हृदयद्रावक घटना घडल्याने सत्ताधाऱ्यांची लाज काढली जात आहे. विरोधकांनी या घटनेच्या निमित्ताने सरकारवर घणाघाती टीका केली असून, “जिथे मुख्यमंत्री निवडून येतात, तिथेच महिलांचं रक्षण होऊ शकत नसेल, तर सामान्य जनतेचं काय?” असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे.
महिलांच्या सुरक्षेचा डंका पिटणाऱ्या सरकारने आता गप्प बसू नये, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पीडितेला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणीही होत आहे.
या अमानवी घटनेने संपूर्ण राज्यच नव्हे तर देशभरातील नागरिकांची मनं सुन्न झाली आहेत. न्यायाची अपेक्षा ठेवत सिरीशासारख्या महिलांसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, हीच जनतेची मागणी आहे.