
नवी दिल्ली वृत्तसंस्था
उत्तर भारतापासून ते दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेचा पारा 40 अंश पार केला असताना भारतापर्यंत कमीजास्त प्रमाणात उकाडा नागरिकांच्या अडचणी वाढवत आहे. काही भागांमध्येतर, पारा 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं ही होरपळ कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे?
हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. याचं उत्तर हवामान विभागाच्या नुकत्याच करण्यात आलेल्या निरीक्षणातून समोर आलं असून, मान्सूनच्या रुपात ही आनंदवार्ता लवकरच दार ठोठावणार असल्याची वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यंदा वेळेआधीच मान्सून निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मागील काही दिवसांपासून ढगांच्या हालचाली वेगानं सुरू असून वाऱ्याच्या वेगातही सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळत असल्यानं यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अंदमान आणि निरोबार बेटांवर दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या धर्तीवर देशातील मान्सूनचं प्रमाण आणि त्याचा वेग याविषयीचे अंदाज वर्तवण्यात येतात. सहसा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मोसमी पावसाच्या आगमनाची अपेक्षा असते. यावेळी मात्र जणू तो सर्वांचीच विनवणी ऐकत आठवडाभर आधीच दाखल होणार असल्याची चिन्हं आहेत. अगदी तारखेचाच विषय म्हणावा तर, यंदा 10 मे पर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार इथं दाखल होऊ शकतो.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची चर्चा असतानाच दक्षिण- पश्चिम मोसमी वारे देशात 15 मे च्या जवळपास दाखल होऊन ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत काढता पाय घेतात. या वाऱ्यांच्या प्रभावामुळं देशात सर्वाधिक पर्जन्यमानाचा कालावधी पाहायला मिळतो. तर, ऑक्टोबरनंतर थेट डिसेंबरपर्यंत ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळं देशात पावसाची सुरुवात होते.