
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, चेंबूर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून २१ वर्षीय युवकाने आपल्या मित्राचा खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
फरीद शेख (२०) हा युवक गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहत होता. सोमवारी रात्री तो चेंबूर कॉलनीमधील लालमिठी मैदान परिसरात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे राहणाऱ्या वैभव भिंगारदिवे (२१) याच्याशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर फरीदने वैभवच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यामुळे संतप्त झालेल्या वैभवने रागाच्या भरात फरीदवर चाकूने वार केले.
या हल्ल्यात फरीद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून काही तासातच आरोपी वैभव भिंगारदिवे याला अटक केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.