मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील नागरिक, राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार यांच्या प्रतीक्षेला आज राज्य निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार असून, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

मतदान व मतमोजणी
२ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. अंतिम निकालांची घोषणा १० डिसेंबर रोजी करण्यात येईल.
निवडणूक कार्यक्रम
टप्पा दिनांक
* अर्ज दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५
* अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५
* अर्ज छाननी १८ नोव्हेंबर २०२५
* अर्ज माघारी (सामान्य) २१ नोव्हेंबर २०२५
* आक्षेपित ठिकाणी अर्ज माघारी २५ नोव्हेंबर २०२५
* उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर २०२५
* मतदान २ डिसेंबर २०२५
* मतमोजणी ३ डिसेंबर २०२५
* निकाल घोषणा १० डिसेंबर २०२५
मतदार संख्या, उमेदवारी व केंद्रे
या निवडणुकीत राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींसाठी एकूण ६,८४९ सदस्य व २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. राज्यात एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून १३ हजार ३५५ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. ईव्हीएमचीही मुबलक व्यवस्था करण्यात आली असून १३,७२६ कंट्रोल युनिट व २७,४५२ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नव्या नगरपरिषदांची भर
यंदा निवडणूक प्रक्रियेत १० नवी नगरपरिषद आणि १५ नव्या नगरपंचायतींचा समावेश झाला आहे. दरम्यान, २३६ नगरपरिषदांची मुदत संपली असून २७ नगरपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे.
मतदारांसाठी डिजिटल सुविधा
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विशेष संकेतस्थळ तसेच मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून मतदारांना :
* मतदान केंद्राची माहिती
* उमेदवारांचे तपशील व प्रतिज्ञापत्र
* गुन्हेगारी पार्श्वभूमी
* शैक्षणिक पात्रता
* आर्थिक स्थिती
* आदी माहिती मिळणार आहे.
उमेदवारांच्या खर्चमर्यादा वाढ
निवडणुकीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा नव्याने निश्चित केली आहे:

संस्था व पद खर्चमर्यादा
अ वर्ग नगरपरिषद अध्यक्ष ₹१५ लाख
अ वर्ग सदस्य ₹५ लाख
ब वर्ग अध्यक्ष ₹११.२५ लाख
ब वर्ग सदस्य ₹३.५० लाख
क वर्ग अध्यक्ष ₹७.५० लाख
क वर्ग सदस्य ₹२.५० लाख
नगरपंचायत अध्यक्ष ₹६ लाख
नगरपंचायत सदस्य ₹२.२५ लाख
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींची यादी
राज्यात पालघरपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून सर्व जिल्ह्यांची नगरपरिषद व नगरपंचायत यादी आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
* जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचातींची यादी
पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं)
रायगड- अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.). रत्नागिरी- चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि रत्नागिरी.
सिंधुदूर्ग- कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला.
ठाणे- अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर.
अहिल्यानगर- देवळाली- प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर.
धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर- वरवाडे.
जळगाव- जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव आणि यावल.
नंदूरबार- शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा.
नाशिक- भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव- बसवंत आणि त्र्यंबक.
कोल्हापूर- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.
पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.).

सांगली- आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा.
सातारा- कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई.
सोलापूर- अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला.
बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी- वैजनाथ.
छत्रपती संभाजीनगर- फुलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर.
धाराशिव- भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा.
हिंगोली- बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी. जालना- अंबड, भोकरदन आणि परतूर.
लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर.
नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा.
परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ.
अकोला- अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा.
अमरावती- अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड.
बुलढाणा- बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा.
वाशीम- कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वशीम.
यवतमाळ- आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर- नबाबपूर आणि पांढरकवडा.
भंडारा- पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा.
चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा.
गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली.
गोंदिया- गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा.
नागपूर- बहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.), बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर- ब्रह्मणी, कामठी, कांद्री- कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव- तरोडी (खू) पांढुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान- पिपरी, मोवाड, वाडी आणि येरखेडा (न.पं.).
वर्धा- आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.

या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता हस्तगत करण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नागरिकांसाठीही स्थानिक प्रशासनात भाग घेण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.


