
कोल्हापूर प्रतिनिधी
दिवाळीच्या आनंदाच्या सणात कोल्हापूर जिल्ह्यात दुःखाचे सावट पसरले आहे. भाऊबीजेच्या दोन दिवस आधीच कोल्हापूर”राधानगरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, एका दहा वर्षीय मुलावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.
ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 21 ऑक्टोबर) दुपारी सुमारे एकच्या सुमारास कौलव गावाजवळ ‘बुवाचा वडा’ परिसरात घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात तरसंबळे येथील कांबळे कुटुंबातील तिघांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांची नावे
श्रीकांत कांबळे (वय 30, रा. तरसंबळे),
दीपाली गुरुनाथ कांबळे (वय 28, रा. शेंडूर, ता. कागल), श्रीकांत यांची बहीण
शिवज्ञा सचिन कांबळे (वय 3)
तर या अपघातात अथर्व गुरुनाथ कांबळे (वय 10) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. अपघाताची वार्ता समजताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला.
कसा झाला अपघात?
श्रीकांत कांबळे हे आपल्या बहिणी दीपाली, भाची शिवज्ञा आणि भाचा अथर्व यांच्यासह दिवाळीचा बाजार करून तरसंबळे गावाकडे दुचाकीवरून परतत होते. दीपाली यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या मुलासह माहेरी आल्या होत्या. भावाबहिणीने मिळून दिवाळीचा बाजार केला आणि घरी परतत असतानाच भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातानंतर शेतात काम करणाऱ्या काही लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी दिली.
वाढते अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
कोल्हापूर-राधानगरी मार्गावर गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता. अपुरी रस्त्याची रुंदी, वाढती वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या मार्गावर जीवघेणे अपघात वाढत चालले आहेत, अशी नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
भाऊबीजेच्या आदल्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे तरसंबळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.