
सातारा प्रतिनिधी
सातारा येथील ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे यंदा एक वेगळाच ऐतिहासिक ठसा उमटविणार आहे. या संमेलनाचे बोधचिन्ह सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी साकारले असून, त्याचे अनावरण बुधवारी (दि.१०) पुणे येथे होणार आहे.
या संदर्भातील माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद (शाहूपुरी शाखा) आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या समारंभात स्वतः शि. द. फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होणार आहे.
या प्रसंगी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असतील. महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांचीही सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
कार्याध्यक्ष कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी साताऱ्यातील उद्योगपती वसंत जोशी आणि सहकार खात्यातील कर्तबगार अधिकारी जनार्दन (जे. पी.) शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसंत जोशी हे ‘हॉटेल चंद्रविलास’ या उद्योगसमूहाचे प्रमुख असून, सामाजिक कार्यात त्यांचा कायम सहभाग असतो. तर जनार्दन शिंदे हे सहकारी संस्थांना दिलेल्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यात परिचित आहेत. अनेक बँका व पतसंस्था अडचणीत असताना त्यांनी सहकार खात्याच्या माध्यमातून त्यांना दिलेला आधार उल्लेखनीय ठरला आहे.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निवडीची घोषणा केली असून, त्यामुळे संमेलनाच्या स्वागत समितीला बळकटी मिळाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.