
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नाला आता नवे बळ मिळणार आहे. म्हाडाच्या विविध वसाहतींच्या पुनर्विकासातून तब्बल १० ते १२ हजार नव्या घरांची निर्मिती होणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे. वांद्रे रिक्लेमेशन, वरळी आदर्शनगर, अभ्युदयनगर, कामाठीपुरा, जीटीबीनगर आणि मोतीलालनगर या भागांतील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास होणार असून, अनेक नामवंत बांधकाम कंपन्यांना कामगिरी सोपवण्यात आली आहे.
राज्य सरकारने या पुनर्विकास योजनांना मंजुरी दिली असून, पुढील चार ते पाच वर्षांत या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची मोठी लॉटरी काढणे शक्य होणार आहे.
वांद्रे रिक्लेमेशन व वरळी आदर्शनगर
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या दोन्ही वसाहतींचा पुनर्विकास लवकरच सुरू होणार आहे. बांधकाम संस्थांची नियुक्तीही झाली असून, म्हाडाला येथे १,००० ते १,५०० घरे मिळणार आहेत.
अभ्युदयनगर, काळाचौकी
या भागातील वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेमार्फत केला जाणार आहे. ५०० ते ६०० सदनिका म्हाडाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
कामाठीपुरा
येथील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने C&D क्षेत्रासाठी निविदा काढली आहे. प्रकल्पांतर्गत ८,००० भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची घरे, तर ८०० मालकांना प्रत्येकी ५० चौरस मीटर जागेवर घरे दिली जाणार आहेत. याप्रकल्पातून म्हाडाला १,००० ते १,२०० नव्या घरांचा साठा मिळणार आहे.
मोतीलालनगर, गोरेगाव (पश्चिम)
मोतीलालनगर १, २ आणि ३ वसाहतींचा भव्य पुनर्विकास अदाणी समूह करणार आहे. ३,७०० रहिवाशांना १,६०० चौरस फुटांची घरे, तर म्हाडाला तब्बल ७,००० ते ८,००० घरांचा साठा उपलब्ध होणार आहे.
जीटीबीनगर, सिंधी वसाहत
११.२० एकर क्षेत्रफळाच्या या वसाहतीचा पुनर्विकास किस्टोन रिअॅल्टर्सकडून केला जाणार आहे. १,२०० रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची घरे मिळणार असून, म्हाडाच्या वाट्याला ७०० ते ८०० घरे येणार आहेत.
या प्रकल्पांमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे. लवकरच म्हाडा यासंदर्भातील लॉटरीची अधिकृत घोषणा करणार असून, इच्छुकांना तयार राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.