
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, आयपीएल २०२५ पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे
स्पर्धेतील उर्वरित सामने धर्मशाला वगळता संपूर्ण भारतात खेळवले जातील. तत्पूर्वी आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रद्द झाल्यानंतर ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशाप्रकारे ही स्पर्धा लवकच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मायदेशी परतलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या संबंधित आयपीएल फ्रँचायझींमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की बीसीसीआयने फ्रँचायझींना मंगळवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. कारण त्यांना आयपीएल नियोजित तारखेला म्हणजेच २५ मे रोजी पूर्ण करायचे आहे.
कदाचित आणखी विलंब झाला तर फायनल सामना ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मधील अजूनही १६ सामने शिल्लक आहेत, त्यामुळे बीसीसीआय अनेक डबल हेडरसह लीग पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. जर बीसीसीआयला देशभरात लीग आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळाली नाही, तर उर्वरित सामने बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये खेळवले जाऊ शकतात. आज बीसीसीआयची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सर्व संघांना सुधारित वेळापत्रक पाठवले जाईल.
आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, नवीन वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी ते सरकारची परवानगी घेतील. ते म्हणाले, ‘सध्या आयपीएलचे महत्त्व पाहता, ते पुन्हा सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणे देखील आवश्यक असेल. संपूर्ण प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय लवकरच आयपीएल पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर करेल.’