उमेश गायगवळे मुंबई
कधी कधी एखादी घटना केवळ गुन्हेगारी प्रकरण म्हणून इतिहासात नोंदली जात नाही; ती समाजाच्या अंतरात्म्याला हादरवून सोडते. व्यवस्था, सत्ता आणि कायदा या तिन्हींच्या मर्यादा उघडपणे दाखवून देते. तामिळनाडूतील साथानकुलम येथे घडलेले बाप–लेकाच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण हे असेच एक हृदय पिळवटून टाकणारे सत्य ठरले. २०२० च्या कोरोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना केवळ दोन व्यक्तींच्या मृत्यूची कहाणी नव्हती; ती सत्तेच्या गैरवापराची, मानवी हक्कांच्या पायमल्लीची आणि न्यायासाठी उभ्या राहिलेल्या एका स्त्रीच्या अद्भुत धैर्याची कथा होती.
या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. सोशल मीडियापासून रस्त्यांपर्यंत संताप उसळला. “खाकी वर्दी संरक्षणासाठी आहे की अत्याचारासाठी?” हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात घर करून बसला. पण या अंधारातही एक प्रकाशकिरण होता. खाकी वर्दीतीलच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने सत्यासाठी आवाज उठवला. ती होती हेड कॉन्स्टेबल रेवती. व्यवस्थेच्या दबावाला न जुमानता, सहकाऱ्यांविरुद्ध उभे राहण्याचे धाडस करणारी ही स्त्री त्या काळोख्या रात्रीची सर्वात महत्त्वाची साक्षीदार ठरली.

२०२० च्या जून महिन्यात देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते. लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू होते. तामिळनाडूतील तूतीकोरिन जिल्ह्यातील साथानकुलम या छोट्याशा शहरात पी. जयराज नावाचे व्यापारी मोबाईल अॅक्सेसरीचे दुकान चालवत होते. १८ जूनच्या रात्री दुकान बंद करण्याची वेळ उलटून गेली होती. दुकान पूर्णपणे बंद झाले नव्हते आणि काही कामगार अजूनही तेथे उभे होते. त्याच वेळी पोलिसांची गाडी तिथे येऊन थांबली. दुकान उघडे असल्याचे पाहून पोलिसांनी संताप व्यक्त केला. शिवीगाळ सुरू झाली. जयराज यांनी नम्रपणे थोडा वेळ मागितला. पण परिस्थिती तिथेच चिघळली. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले. त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती की ही एक साधी अटक नव्हे, तर एका भयावह शोकांतिकेची सुरुवात आहे.
वडिलांना पोलिसांनी नेल्याची बातमी मिळताच त्यांचा मुलगा जे. बेनिक्स पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना विनंती केली की वडिलांना सोडून द्या. परंतु त्या विनंतीचे उत्तर अत्यंत क्रूर होते. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्या क्षणापासून त्या बाप-लेकाच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र सुरू झाली.
त्या रात्री पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबल रेवती यांना सुरुवातीपासूनच काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव होत होती. सुमारे रात्री ८.५० च्या सुमारास त्या पोलीस ठाण्यात पोहोचल्या. आतून किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्या आत गेल्या आणि त्यांनी पाहिलेले दृश्य त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जयराज आणि बेनिक्स यांना लाठ्यांनी आणि हाताला लागेल त्या वस्तूंनी निर्दयीपणे मारहाण करत होते.

रेवती यांनी नंतर न्यायालयात दिलेल्या साक्षीत सांगितले की दोघांनाही तासन्तास मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्यांना लाठ्यांनी, काठ्यांनी आणि हाताला लागेल त्या वस्तूंनी मारले. अत्याचार इतका क्रूर होता की त्यांच्या गुप्तांगांवरही प्रहार करण्यात आले. काही वेळा मारहाण थांबवून आरोपी पोलिस मद्यपान करत आणि पुन्हा छळ सुरू करत. दोघेही रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या शरीरातून सतत रक्त वाहत होते. इतकेच नव्हे, तर जमिनीवर सांडलेले रक्त त्यांच्याकडूनच पुसून घेतले गेले.
ही केवळ मारहाण नव्हती; तो मानवी प्रतिष्ठेचा अपमान होता. त्या क्षणी कायद्याच्या रक्षणासाठी असलेली खाकी वर्दीच क्रौर्याचे प्रतीक बनली होती.
रेवती या सर्व घटनांच्या साक्षीदार होत्या. त्या मनाने खूप अस्वस्थ झाल्या होत्या. जखमी अवस्थेत असलेल्या जयराज आणि बेनिक्स यांना त्यांनी कॉफी देण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर पोलिसांनी तो कप फेकून दिला. त्या क्षणी रेवतींना जाणवले की त्या एका अशा घटनेच्या साक्षीदार आहेत जी इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली जाईल. काही वेळानंतर त्या तिथून बाहेर पडल्या. पण त्या रात्रीचे दृश्य त्यांच्या मनातून कधीच पुसले गेले नाही.
नंतर पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. परंतु तुरुंगात पोहोचल्यानंतर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यांना कोविलपट्टी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रचंड रक्तस्त्रावामुळे बेनिक्सचा मृत्यू झाला. काही वेळातच जयराज यांनीही उपचारादरम्यान प्राण सोडले. एका बापाचा आणि मुलाचा असा अंत झाला की ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले.
या घटनेची माहिती बाहेर येताच देशभरात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर न्यायाची मागणी होत होती. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लोकांचा रोष उफाळून आला.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. न्यायिक दंडाधिकारी पोलीस ठाण्यात आले. त्या वेळी रेवती यांनी पुढे येण्याचा निर्णय घेतला. परंतु तो निर्णय सोपा नव्हता. त्या एक कनिष्ठ कर्मचारी होत्या. आरोपी अधिकारी प्रभावशाली होते. त्यांना भीती वाटत होती, आपल्या नोकरीचे काय होईल? आपल्या कुटुंबाचे काय होईल?
मॅजिस्ट्रेटसमोर उभ्या राहिलेल्या रेवती यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले, “सर, मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. पण मला दोन लहान मुली आहेत. तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकता का?”
या एका वाक्यात एका आईची भीती, एका कर्मचाऱ्याची असुरक्षितता आणि एका प्रामाणिक मनाची तगमग दडली होती. न्यायालयाने त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रेवती यांनी त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. त्यांनी मिनिटागणिक तपशील दिला, कधी मारहाण झाली, कशी झाली, कोण सहभागी होते, आणि पीडितांवर कोणते अत्याचार झाले.
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे होते. मात्र त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या पोलिसांची ओळख पटवणे आवश्यक होते. येथेही रेवती पुढे आल्या. त्यांनी त्या फुटेजमधील नऊ पोलिसांची ओळख पटवली. हीच ओळख न्यायालयात आरोपींविरुद्धचा भक्कम पुरावा ठरली.

या काळात रेवतींना प्रचंड दबाव आणि धमक्यांना सामोरे जावे लागले. त्यांना गप्प बसण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही. शेवटी न्यायालयात त्यांची साक्ष नोंदवली गेली.
दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने या प्रकरणातील नऊ पोलिसांना दोषी ठरवले. हत्या, पुरावे नष्ट करणे आणि सत्तेचा गैरवापर या गंभीर आरोपांखाली त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पीडित कुटुंबाला १.४० कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
हा निकाल केवळ एका गुन्ह्याचा शेवट नव्हता. तो न्यायव्यवस्थेने दिलेला एक स्पष्ट संदेश होता, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. खाकी वर्दी ही संरक्षणासाठी आहे, अत्याचारासाठी नाही.

आज रेवतीचे नाव देशभर चर्चेत आहे. त्यांनी दाखवून दिले की व्यवस्था कितीही कठोर असली तरी तिच्यातच काही माणसे अशी असतात जी सत्यासाठी उभी राहतात. स्वतःच्या सहकाऱ्यांविरुद्ध उभे राहणे, धमक्यांना न जुमानणे आणि न्यायासाठी आवाज उठवणे हे सोपे नव्हते. परंतु त्यांनी ते केले.
जयराज आणि बेनिक्स यांचे आयुष्य परत येणार नाही. परंतु त्यांच्या मृत्यूने देशाला एक मोठा धडा दिला, एका धाडसी व्यक्तीचा आवाज संपूर्ण व्यवस्थेला हादरवू शकतो.
खाकी वर्दीतील त्या एका आवाजाने दोन निष्पाप जीवांना उशिरा का होईना न्याय मिळवून दिला.
आणि त्या आवाजाचे नाव आहे – रेवती.


