निफाड (नाशिक)
निफाड तालुक्यात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून, या थंडीचा पहिला बळी घेतल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली. देवगाव (ता. निफाड) येथील २२ वर्षीय तरुणाचा अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास समीर दौलत सोनवणे (वय २२) हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तत्काळ कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने समीरचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, निफाड तालुक्यातील गहू कृषी संशोधन केंद्रात शुक्रवारी किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. याआधी गुरुवारी प्रथमच ५.९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत तापमानात सुमारे दोन अंशांची घसरण झाली असून, मागील पाच दिवसांत पाच ते सहा अंशांनी पारा खाली आला आहे. नाशिक शहरातही शुक्रवारी तापमान ९.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे नोंदले गेले.
गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात प्रचंड गारठा जाणवत असून, रस्त्यांवरील वर्दळही लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र होते. शुक्रवारी पहाटेपासून दुपारपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहिल्याने नागरिक अक्षरशः गारठले होते.
ही थंडी गहू, कांदा व इतर रब्बी पिकांसाठी पोषक ठरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, तापमान सातत्याने घसरत राहिल्यास द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती बागायतदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच रात्री उघड्यावर राहणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.


