
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानात गुरुवारपासून (२३ ऑक्टोबर) दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी सांताक्रूझ केंद्रावर ३५.९ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. सध्या दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. दिवसभराच्या तडाख्याने आणि दमट हवेमुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीत मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे. परिणामी, कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे गुरुवारपासून पुढील दोन दिवस मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळेल. शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी हवेत हलका गारवा जाणवण्याचीही शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात ३४ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदले जात असून, नागरिकांना प्रखर उन्हाचा चटका बसत आहे. सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील इतर भागातही सध्या उन्हाचा तडाखा कायम असून, अनेक ठिकाणी तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात आहे.
दरम्यान, अग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढत असून, दक्षिण अंदमान समुद्र परिसरात नव्याने कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीचा परिणाम पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.