
मुंबई प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या समग्र वाङ्मयाचे प्रकाशन करण्यात आले. या साहित्यामुळे तरुण पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फुले दांपत्यांच्या समग्र वाङ्मयाचे प्रकाशन झाले. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत हे महावाङ्मय प्रकाशित करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
२७ हजार प्रतींची छपाई
या समग्र वाङ्मयात महात्मा फुले यांचे २३, तर सावित्रीबाई फुले यांचे १४ ग्रंथ, त्यांचा पत्रव्यवहार तसेच महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि साताऱ्यातील नायगाव येथील सावित्रीबाईंच्या शिल्पसृष्टीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथाला जोडण्यात आली आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या मान्यतेने प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या एकूण २७ हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ७५० प्रतींचे वितरण जिल्हास्तरीय शिक्षण विभाग, आर्थिक विकास मंडळ, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमार्फत होणार आहे.