* राजेंद्र ‘राजू’ भाळे टोळीवर पोलीसांचा घाव
पुणे प्रतिनिधी
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात दहशत पसरवून नियोजनबद्ध गुन्हे करणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे टोळीवर पोलिसांनी थेट महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावून कारवाई करत सर्वांना हादरवून सोडले. तब्बल १३ जणांना या कडक कायद्यात गुंतविण्यात आले असून, हा गेल्या काही वर्षांतला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे उत्तम जालिंधर जाधव (३४, रा. खोरोची) यांची दगडाने ठेचून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासात उघडकीस आले की, या हत्येत भाळे टोळीचे १३ जण सहभागी होते.
वालचंदनगर पोलिसांनी राजेंद्र उर्फ राजू भाळे (रा. खोरोची), रामदास उर्फ रामा भाळे, शुभम उर्फ दादा आटोळे, स्वप्निल वाघमोडे, नाना भाळे, निरंजन पवार, तुकाराम खरात, मयूर उर्फ जिजा पाटोळे, अशोक यादव, धनाजी मसुगडे, सोमनाथ पवार, सनी हरिहर, अक्षय शिंगाडे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली.
राजू भाळे यांच्यावर आधीच १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, इंदापूर, माळशिरस, नातेपुते परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तो सतत गुन्हे करीत होता. या टोळीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही धाडसी मोहीम पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुणगे, महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, प्रेमा सोनावणे आणि सचिन खुळे यांनी भूमिका बजावली.
“गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळात अधिकाधिक सराईत गुन्हेगारांवर मकोका लावला जाईल, तसेच त्यांना मदत करणाऱ्यांनाही वाचता येणार नाही,” असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिला.


