
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे ठरणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार असून, १८ जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या तारखांना अंतिम रूप विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आले.
विधानभवन येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विधान परिषदेतील आणि विधानसभेतील सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
विरोधी पक्षाकडून अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, अमीन पटेल, भास्कर जाधव तर सत्ताधारी पक्षाकडून दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भरती यांचाही सहभाग होता.
विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती दिली. राज्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष लक्षवेधी ठरणार आहे.