
बदलापूर प्रतिनिधी
बदलापूर : धुळवडीच्या दिवशी उल्हासनदीत चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, शनिवारी मुंबईच्या आणखी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी मृतांची नावे असून, दोघेही मुंबईतील पवई, हिरानंदानी आयटी पार्क परिसरातील रहिवासी होते.
शनिवारी हे दोघे मित्र फेरफटका मारण्यासाठी उल्हास नदीवरील वसत बंधाऱ्यावर गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागल्याची माहिती भागवत सोनोने यांनी दिली.
दरम्यान, उल्हासनदीत वारंवार घडणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक पर्यटक पोहण्यासाठी नदीत उतरतात, मात्र पाण्याची खोली माहिती नसल्याने बुडण्याच्या घटना घडतात. अशा अपघातांना रोखण्यासाठी नदीकिनारी चेतावणी फलक लावण्याची मागणी होत आहे.