
पुणे प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून सध्या राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप होत असून, ते अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जैन समाजाने मोहोळ यांच्यावर या जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप केला आहे. ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली असून, या कंपनीत मोहोळ यांची भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत म्हटले, “मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी संगनमताने जैन बोर्डिंगची जागा हडपली आहे.”
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जैन समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, राजू शेट्टी आणि जैन समाज आक्रमक भूमिकेतच कायम आहेत.
राजू शेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिला, “आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहार रद्द न झाल्याशिवाय लढा सुरूच राहील. दिवाळीनंतर मुख्यमंत्री पुण्यात येऊन हा व्यवहार रद्द करतील, तेव्हा आम्ही त्यांचा सत्कार करू.”
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, “जैन समाजाच्या होस्टेलची जागा हडपली गेली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही नेत्यांचे नातलगसुद्धा या व्यवहारात भागीदार असल्याचे दिसते. नफा आणि धर्म यापैकी सरकार कोणाला प्राधान्य देणार, हे आता स्पष्ट व्हायला हवे.”
जैन बोर्डिंग हाऊसचा इतिहास
शिवाजीनगरमधील हे बोर्डिंग हाऊस १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी उभारले. येथे दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. काही महिन्यांपूर्वी विश्वस्त मंडळाने पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडला होता, मात्र काही घटकांनी त्यास विरोध केला. त्यानंतर अचानक विक्री झाल्याचा आरोप समाजाकडून करण्यात आला आहे.
जैन समाजाच्या मते, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मंजुरी देताना नियमांचे उल्लंघन केले. या संपूर्ण व्यवहारात मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सध्या मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या या दौऱ्याबद्दल आणि पुढील भूमिकेबद्दल सर्वांचे लक्ष लागले आहे.