
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेत सर्व विभागांतील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत ८ सहस्र ५० कामगारांना ‘समान काम समान वेतन’ मिळावे, यासाठी कामगार ‘समता कामगार संघा’च्या नेतृत्वाखाली १० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काम बंद आंदोलनाद्वारे नवी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा मानस नाही; मात्र प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने वरील कटू निर्णय आम्हाला घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी व्यक्त केली.
शहरातील सर्व पायाभूत सुविधा, स्वच्छता, कचरा वाहतूक, पाणीपुरवठा मलनिःस्सारण, स्मशानभूमी, उद्यान यांसह अन्य विभागातील कामगार प्रत्यक्षात कामावर उपस्थित रहातील; परंतु कोणतेही काम करणार नाहीत.