जयपूर:
सरकारी नोकरी आणि कुटुंबाची मालमत्ता मिळवण्याच्या हव्यासातून एका तरुणीने स्वतःच्या सख्ख्या आईच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना राजस्थानची राजधानी जयपूर येथे उघडकीस आली आहे. आईला ठार मारण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणी मुख्य आरोपी मुलीसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मृत नीरज शर्मा (वय ४५) या जयपूर न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर ही सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र, हीच नोकरी आणि कुटुंबाची मालमत्ता मिळवण्यासाठी त्यांची मुलगी आयुषी शर्मा हिने आईच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयुषीने चुलता मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्या मदतीने भरतपूर येथील हेमंत शर्मा याला सात लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी नीरज शर्मा यांच्या दैनंदिन हालचालींवर महिनाभर पाळत ठेवली. त्यासाठी थार वाहन भाड्याने घेऊन रेकी करण्यात आली.
३ जुलै रोजी नीरज शर्मा आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परतत असताना भरधाव स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि हा पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले. धडक इतकी भीषण होती की नीरज शर्मा यांचा मृतदेह सुमारे १०० फूट दूर फेकला गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तपासादरम्यान नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाची आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांची चौकशी केली असता आयुषी शर्मा हिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, हेमंत शर्मा, मोहित शर्मा, रोहित जाटव, आकाश शर्मा आणि अरविंद शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. कटातील महत्त्वाचा आरोपी बलराम उर्फ रवी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर सरकारी नोकरी आणि संपत्तीच्या हव्यासाने रक्ताच्या नात्यालाही तिलांजली दिल्याची भावना व्यक्त होत असून, जयपूरसह संपूर्ण राजस्थानात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.


