स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व येथील आरएनए बिल्डिंग शेजारील फुटपाथवर एका अनोळखी वृद्धेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले असून, अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. लघवी करण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून ही क्रूर हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरएनए बिल्डिंगजवळील फुटपाथवर एक अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. सुरुवातीला याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सायन रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात या महिलेचा मृत्यू गळा आवळल्यामुळे आणि डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार नैसर्गिक नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर, खेरवाडी पोलिसांनी २९ एप्रिल रोजी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील खाजगी आणि सरकारी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित इसम रात्री २:५५ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेरा तोडताना दिसून आला. दरम्यान, घटनेच्या रात्री गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार बीकेसी परिसरात गस्तीवर असताना त्यांनी अशाच वर्णनाच्या एका संशयित इसमाला हटकले होते. त्या इसमाने आपले नाव भानूदास कांबळे असल्याचे व तो महाराष्ट्र नगर परिसरात राहत असल्याचे सांगितले होते. सीसीटीव्हीमधील इसम आणि गस्तीदरम्यान हटकलेला इसम हा एकच असल्याची खात्री होताच, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भानूदास विठ्ठल कांबळे (४४) याला ठाण्यातील वर्तकनगर येथून ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २६ एप्रिलच्या रात्री आरोपी एका हळदीच्या कार्यक्रमासाठी वांद्रे येथे आला होता. घरी परतत असताना त्याने फुटपाथवर उभे राहून लघवी केली, ज्याला तिथे बसलेल्या वृद्ध महिलेने विरोध करत शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आरोपीने जमिनीवरील वीट उचलून तिच्या डोक्यावर मारली आणि त्यानंतर दोन्ही हातांनी गळा दाबून तिची हत्या केली व तेथून पसार झाला. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख पटली असून, त्यांचे नाव सौभाग्यअम्मा हनमंता कर्थीम्यनुर (७८) असे आहे. त्या शाहूनगर, धारावी येथील रहिवासी होत्या आणि त्या हरवल्याबाबतची तक्रार २३ एप्रिल रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात दाखल होती.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार गणेश ठोंबरे, पोलीस हवालदार श्याम ठाकरे, पोलीस शिपाई समीर कांबळे, पोलीस शिपाई महेश पाटील आणि पोलीस शिपाई सागर गायकवाड या पथकाने पार पाडली आहे.


