सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षकांची मोठी कमतरता जाणवत असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण केल्यानंतर सुमारे आठ हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या बदल्या आता जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाच्या नियमानुसार या रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरली जाणार असून, त्यानुसार सुमारे आठ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल आणि त्यानंतर फेब्रुवारी–मार्च महिन्यांपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल.
सध्या २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आधी समायोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत शिक्षकांच्या रिक्त पदांकडे लक्ष वेधले होते. यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचे नियोजन गतीने हाती घेतले असून, जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया याच पोर्टलवरून पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यात सध्या जिल्हा परिषदांच्या सुमारे ६३ हजार शाळा असून, त्यामध्ये १.९८ लाख शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, त्यातील १५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भरतीकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी राबवली जाते. साधारणतः ६५ ते ७० हजार शिक्षकांच्या बदल्या होत असल्या तरी ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबरदरम्यान चालत असल्याने शैक्षणिक वर्षाच्या मध्यात शिक्षकांना शाळा बदलावी लागते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता जिल्हाअंतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया एप्रिल ते जून या कालावधीत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत २ हजार ७७५ शाळांमध्ये सध्या ४०२ पदे रिक्त आहेत. यामध्ये पदवीधर शिक्षकांसह मुख्याध्यापकांच्या पदांचाही समावेश आहे. शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरली जाणार असून, २०२५–२६ च्या संचमान्यतेनुसार प्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल आणि त्यानंतर भरतीची मागणी पाठवली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.


