
मुंबई प्रतिनिधी
रिफायनरी प्रकल्प बारसूलाच होणार’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली आहे. या प्रकल्पाला आधीपेक्षा दहा पटीने तीव्र विरोध करू, असे ठणकावतानाच ‘आधी आम्हाला सर्वांना गोळय़ा घाला, नंतरच रिफायनरी प्रकल्प करा’, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
रत्नागिरी जिह्यात राजापूरमधील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्याबाबत गावांनी ठरावही केलेले आहेत. 25 एप्रिल 2023 रोजी येथे आंदोलनाचा भडका उडाला होता. बारसूच्या माळरानावर प्रकल्पासाठी माती परीक्षण केले जाणार होते. ते ग्रामस्थांनी हाणून पाडले. तेव्हा आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला होता. त्यानंतर या प्रकल्पाबाबत सरकार बॅकफूटवर गेले होते.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हा प्रकल्प पुढे रेटला असून हरित रिफायनरी बारसूतच होणार, असा पवित्रा घेतल्याने त्याचा गावकऱयांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
बारसू सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या प्रकल्पाला बारसू आणि पंचक्रोशीतील गावांचा विरोध आहे. त्यात शिवणे खुर्द, धोपेश्वर, गोवळ, देवाचे गोठणे, धुऊलवल्ली अशा गावांचा समावेश आहे.
बारसूच्या सडय़ावर (जांभा खडकाचे विस्तृत पठार) रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू गाव रत्नागिरीतील राजापूरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे तर समुद्र किनाऱयापासून साधारण 10 -15 किलोमीटर आत आहे. नाणारमधील 17 गावांची जमीन याकरिता संपादित केली जाणार आहे. त्यापैकी 14 गावांनी या प्रकल्पाविरोधात ठराव संमत केला होता.
तळकोकणातील हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. रिफायनरी आल्यास मच्छीमारांचे नुकसान होईल. पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढेल, अशी भीती लोकांना आहे. विशेषत आंबा, नारळ, काजू, सुपारीच्या बागायतदारांचे नुकसान होईल. सडय़ावरील कातळशिल्पही नष्ट होण्याची भीती आहे. परंतु, ही ग्रीन रिफायनरी असून तिच्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात येते.