
मुंबई प्रतिनिधी
मानखुर्द पूर्व येथील सिद्धार्थ चौकातील पंचशील बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि बावीस प्रतिज्ञांचे पालन केल्यास जीवनातील दुःखांचा नाश होऊन सुखमय जीवन घडते, असे प्रतिपादन सर जेजे समूह रुग्णालयाचे डॉ. रेवत कानिंदे यांनी केले.
बौद्ध नवयुवक संघ व सुकेशिनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. कानिंदे यांनी ‘धर्मांतरानंतर बदललेली परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते राजू झनके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ध्वजारोहण, बुद्धवंदना, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव खीरदान, भोजनदान आदी कार्यक्रमांनी उत्सवाला रंगत आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. इतरांकडे बोट न दाखवता आपली रेघ मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागील दहा वर्षांपासून आम्ही ‘एक वही एक पेन’ अभियानाद्वारे बाबासाहेबांचा मूलमंत्र अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा”, असे आवाहन झनके यांनी केले. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात झनके व डॉ. कानिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ‘एक वही, एक पेन’ अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अमोल बोधिराज होते. या वेळी निलेश कांबळे, राहुल आवडे, सुकेशिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली मोहिते, अभियानाचे शंकर कांबळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, सम्यक झनके यांच्यासह महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.