
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
कोकणासह मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने कहर केला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा निर्णय घेतला.
पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी कडक आदेश निर्गमित करत नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्याही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संभाव्य धोक्याचा विचार करून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली. “विद्यार्थी, शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता, असे ते म्हणाले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार पावसाचा क्रम कायम राहणार असून नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे दिलासा मिळाला आहे.