
कराड, प्रतिनिधी
“मानवतेच्या आणि न्याय्य हक्काच्या वाटचालीत कोणताही धर्म मोठा नाही. शोषित, पीडित आणि कष्टकऱ्यांच्या वेदना साहित्यरूपाने मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही मानवतेचा ध्वज उंचावण्यासाठी नवी प्रेरणा आहे,” अशा भावना ज्येष्ठ समाजसेवक व लोकबिरादरी प्रकल्पाचे आधारस्तंभ डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प संस्थापक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड. संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोखरक्कम, फुले व पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाला प्रकाश वायदंडे (निमंत्रक), रामभाऊ दाभाडे (स्वागताध्यक्ष), दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, धनगर महासंघाचे अध्यक्ष प्रवीण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“बाबा आमटे यांच्याकडून सेवाभावाची प्रेरणा”
“झाडेवेली, पशुपक्षी, दीनदुबळ्यांची सेवा करणं हीच खरी ईश्वरसेवा आहे. समाजसेवेतील प्रेरणा मला बाबा आमटे यांच्याकडून मिळाली. त्यांनी शिकवल्याप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजकार्यात झोकून द्यायला हवे,” असे आवाहन करताना डॉ. आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्याचा उल्लेख केला.
वननिवासी, आदिवासी व फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आयुष्यभर चालू असल्याचे सांगून, “या सेवेमुळे आयुष्य सार्थक झाल्याची जाणीव होत आहे,” असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
“आदिवासींचे जीवन पुस्तकातून समजत नाही”
डॉ. आमटे म्हणाले, “आदिवासी समाजाचे जीवन केवळ पुस्तकातून कळत नाही, ते प्रत्यक्ष अनुभवावे लागते. सुरुवातीला आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ज्यांच्यासाठी काम करतोय, तेच लोक जवळ येत नव्हते. मात्र, सातत्याने प्रयत्न करत त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. आज या समाजातील अनेक मुले शिकून डॉक्टर, अभियंते, वकील होत आहेत, हे पाहून समाधान वाटते.”
अण्णा भाऊंचा विचार समाजाने जपावा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी प्रतिकूलतेवर मात करत सामान्य माणसाच्या दुःखाला शब्द दिले. त्यांच्या विचारांचा जागर समाजाने अखंड ठेवावा, असे आवाहनही डॉ. आमटे यांनी या प्रसंगी केले.