
मातोश्रीवर भाऊसाहेब बिलेवारांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा प्रवेश; ३ जि.प. सदस्य व ४५ सरपंचांचा ठाकरे गटात समावेश
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रभावी शेतकरी क्रांती संघटनेने आज (शनिवार) मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश झाला.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकजण मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण माझे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जात नाहीत. जे गेले ते गेले, पण त्यांच्या खालील माणसं आजही माझ्यासोबत आहेत.”
या प्रवेश सोहळ्यात खासदार अरविंद सावंत, प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार संजय देरकर, बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यासह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
विदर्भातून सेनेला मोठा बूस्ट
वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात ३ जिल्हा परिषद सदस्य व ४५ सरपंचांनी पक्षप्रवेश केला. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ठाकरे गटासाठी पश्चिम विदर्भात मोठे बळ ठरणार आहे.
पूर्वी या भागातील काही मोठी फळी शिंदे गटात गेल्याने निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणार आहे. बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख बुधवंत यांनी “विदर्भात सेनेचे बळ आणखी वाढवू” असा निर्धार व्यक्त केला.
शेतकरी क्रांती संघटनेचे कार्य घाटमाथा आणि घाटाखालच्या भागात असून, मोठ्या संख्येने आलेल्या या पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सध्या काँग्रेसची नवीन नेतृत्व मांडणी, भाजपची जंबो कार्यकारणी आणि सेनेची भरती मोहीम—अशा तिहेरी राजकीय हालचालींमुळे निवडणूक लढाई रंगतदार होणार आहे.