नवी दिल्ली वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्राला संबोधित करताना देशाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील वाटचालीवर चिंतन करण्याचे आवाहन केले. युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला नवी दिशा देत असल्याचे त्यांनी यावेळी ठळकपणे नमूद केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने आपल्या राष्ट्रीय भाग्याचे शिल्पकार होण्याचा निर्धार केला. स्वातंत्र्यलढ्याच्या ताकदीतूनच नव्या भारताची पायाभरणी झाली, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
“२६ जानेवारी १९५० पासून आपण आपल्या प्रजासत्ताकाला संवैधानिक आदर्शांच्या मार्गावर नेण्यास सुरुवात केली. या दिवशी भारतीय संविधान पूर्णतः अंमलात आले. लोकशाहीची मातृभूमी असलेला भारत वसाहतवादी राजवटीच्या कायद्यांपासून मुक्त झाला आणि एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून उदयास आला,” असे त्या म्हणाल्या.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाचा मजबूत पाया असल्याचे सांगताना राष्ट्रपती मुर्मू यांनी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ही मूल्ये केवळ घटनात्मक तत्त्वे नसून राष्ट्राच्या एकतेचा आणि लोकशाहीच्या आत्म्याचा कणा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात साजरे करण्यात आलेले कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणारे ठरल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. अशा उत्सवांतून देशवासीयांमध्ये एकतेचा आणि सामूहिकतेचा संदेश पोहोचतो, असेही त्या म्हणाल्या.
देशाच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम अशा सर्व दिशांना सांस्कृतिक एकतेची मजबूत वीण घातली. ही सांस्कृतिक एकता आजही भारतीय लोकशाहीला चैतन्य देत असून प्रत्येक भारतीयाला एकत्र बांधून ठेवते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


