मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे सोमवारी रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मुंबईतील भाजपचा एक अभ्यासू, आक्रमक आणि प्रभावी चेहरा हरपला आहे.
दक्षिण मुंबईच्या राजकारणात दबदबा असलेले राज के. पुरोहित यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ या निवडणुकांमध्ये त्यांनी यश संपादन केले. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात त्यांनी कामगार, दुग्धविकास तसेच संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर संघटक म्हणूनही पुरोहित यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली. मुंबईत भाजपचा विस्तार करण्यामध्ये आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. विशेषतः मुंबईतील राजस्थानी आणि मारवाडी समाजाला भाजपशी जोडण्यामध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक शैली ही त्यांची ओळख होती. विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना ते नेहमीच ठामपणे भूमिका मांडत. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मजबूत पकड होती. कार्यकर्त्यांमध्ये ते ‘राजभाई’ म्हणून परिचित होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाने एक निष्ठावान नेता आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या विकासात आणि पक्ष संघटनेच्या वाढीत दिलेले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात परिवार आणि मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


