
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान होणार असून यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. यामध्ये ३२ जिल्हा परिषदा, २९ महापालिका, ३३१ पंचायत समित्या आणि २८९ नगरपालिका व नगरपरिषदांचा समावेश आहे.
आयोगाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका, तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या होणार आहेत. सर्व निवडणुकांचे निकाल मात्र एकाचवेळी जाहीर करण्यात येतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. आता आरक्षणासह गट, गण, वॉर्ड, प्रभागरचना बदलून या संस्था नव्याने निवडून येणार आहेत. राज्यातील जवळपास ९ कोटी ८० लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेले मतदार या निवडणुकीस पात्र ठरणार आहेत.
मतदार याद्यांची पडताळणी
प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारसंघनिहाय यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर केली जाईल.
देशभरात मतदार याद्यांवरून होत असलेला वाद टाळण्यासाठी आयोगाने सावध पवित्रा घेतला आहे. सुरुवातीला मतदारसंघनिहाय यादी जाहीर होणार असून त्यावर आक्षेप-हरकती मागवण्यात येतील. दुरुस्ती करूनच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुका
* जिल्हा परिषदा : ३२
* पंचायत समित्या : ३३१
* नगरपालिका : २४७
* नगरपंचायती : ४२
* महापालिका : २९