
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या संदर्भातील अधिकृत आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील २७,९५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार होते. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. अखेर, वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पासून पुढील कालावधीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.
यासाठी राज्य सरकारने ३४६,२६,०८,००० रुपयांच्या अनुदानाला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १९ महिन्यांच्या किमान वेतनाच्या थकबाकीला मंजुरी दिली आहे.