
सातारा प्रतिनिधी
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाची आज (१० सप्टेंबर) साताऱ्यात शौर्य दिन म्हणून आठवण काढण्यात आली. तब्बल ८१ वर्षांपूर्वी नायकवडींनी सातारा जिल्हा तुरुंगाच्या तटावरून उडी घेत तुरुंग फोड केला होता. या घटनेने स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली होती.
हुतात्मा शिक्षण उद्योगसमूह वाळवा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी म्हणाले, “अण्णांच्या जीवनचरित्रातून तरुणांनी देशप्रेम, शौर्य आणि प्रेरणा घ्यावी. १० सप्टेंबर हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. तो दिवस आपण शौर्य दिन म्हणून पाळतो.”
सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण करून अण्णांना अभिवादन करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, कारागृहप्रमुख रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, व्ही. बी. पाटील, शिक्षक-प्राध्यापक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सातारा प्रतिसरकारामध्ये नागनाथअण्णांची भूमिका मोलाची होती. तब्बल ६४० गावे इंग्रज सत्तेविरोधात उभी ठाकली. हा लढा देश एकसंध ठेवण्यासाठी आजही प्रेरणादायी आहे.
या स्मरण सोहळ्याला हणमंत पाटील, प्रा. विजय निकम, असलम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.