
मुंबई प्रतिनिधी
देशभरातील ग्रामविकासाच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 210 सरपंचांपैकी महाराष्ट्रातील 15 सरपंचांची निवड विशेष पाहुणे म्हणून करण्यात आली आहे.
यापैकी 9 महिला सरपंचांचा सहभाग हा राज्यासाठी अभिमानाचा विषय ठरत आहे.
केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाच्या वतीने या सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आपल्या गावात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणणाऱ्या, तसेच ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ व ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या योजनांचे शंभर टक्के यशस्वी कार्यान्वयन करणाऱ्या सरपंचांचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील निवडलेले सरपंच –
१) प्रमोद नरहरी लोंढे – लोंढेवाडी, माढा, सोलापूर
२) जयश्री धनंजय इंगोले – खासळा नाका, कामठी, नागपूर
३) संदीप पांडुरंग ढेरंगे – कोरेगाव भीमा, शिरूर, पुणे
४) डॉ. अनुप्रिता सचिन भांडे – म्हातोडी, अकोला
५) नयना अशोक भुसारे – भावसे, शहापूर, ठाणे
६) सुनिता दत्तात्रय मिटकरी – ढोरखेडा, मालेगाव, वाशिम
७) अपर्णा नितीन राऊत – कोंढाळा, देसाईगंज, गडचिरोली
८) संजीवनी वैजनाथ पाटील – खर्डा, जामखेड, अहिल्यानगर
९) चंद्रकुमार काशीराम बहेकार – भेजपार, सालेकसा, गोंदिया
१०) रोमिला रामेश्वर बिसेन – केसलवाढा/पवार, लाखनी, भंडारा
११) सूरज संतोष चव्हाण – चिंचाळी, दापोली, रत्नागिरी
१२) पार्वती शेषराव हरकल – कुंभारी, जिंतूर, परभणी
१३) प्रमोद किसन जगदाळे – बिदल, मान, सातारा
१४) शशिकांत माधवराव मांगले – कसबेगव्हाण, अंजनगाव सुर्जी, अमरावती
१५) प्रभावती राजकुमार बिराजदार – बामणी, उदगीर, लातूर
विशेष कार्यक्रम –
या सर्व विशेष अतिथींचा 14 ऑगस्ट रोजी औपचारिक सत्कार होणार असून केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
यावेळी “आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समर्थित ‘सभा सार’ अॅप लाँच होणार आहे, तसेच ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे.
लाल किल्ल्यावरील तिरंगा फडकताना महाराष्ट्रातील हे सरपंच देशासोबत अभिमानाने उभे राहतील आणि ग्रामीण भारताच्या प्रगतीची साक्ष देतील.