
मुंबई प्रतिनिधी
मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ 48 तासांच्या आत उचलला जावा असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. भांडुप येथील उषा नगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईची पाहणी त्यांनी केली. मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना दिली.
यावेळी शिंदे म्हणाले की, पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरीही नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत मोठ्या नाल्याची 85 टक्के तर छोट्या नाल्यांची 65 टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली असून अजूनही 15 दिवस हातात आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्ट खालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने दरवर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून 422 ठिकाणी पंप लावले आहेत तर 2 ठिकाणी होल्डिंग पौंड आणि 10 ठिकाणी छोटे पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे महापालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. दादर येथील महापालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि इथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.