मुंबई प्रतिनिधी
तुमचं वाहन २०१९ पूर्वीचं असेल आणि अजूनही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने अशा वाहनांसाठी आता ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. या तारखेनंतर वाहनावर HSRP नसेल, तर मालकाला १०,००० पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी अनिवार्य
केंद्र सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक केलं आहे. या मोहिमेला आतापर्यंत तीनदा मुदतवाढ मिळाली – एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता नोव्हेंबर अखेरपर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे.
तथापि, राज्यातील लाखो वाहनधारकांनी अजूनही या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे “सरकार पुन्हा मुदत वाढवेल का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, परिवहन विभागाने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.
“३० नोव्हेंबर हीच अंतिम तारीख”
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितलं की, “३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
HSRP साठी अर्ज केला पण प्लेट बसवली नाही – ₹१,००० दंड
HSRP साठी अर्जच केला नाही – ₹१०,००० दंड
बनावट वेबसाइट्सपासून सावधान!
HSRP नावाखाली बनावट वेबसाइट्स आणि एजंटमार्फत नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच अर्ज करावा, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
आता केंद्रे उपलब्ध, पण वेळ कमी
पूर्वी HSRP फिटमेंट सेंटर कमी असल्याने नागरिकांना अडचणी आल्या होत्या. मात्र आता २० हून अधिक अधिकृत सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वाहनधारकांनी लवकरात लवकर हे काम उरकावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या राज्यातील केवळ ४० टक्के वाहनांवरच HSRP बसवण्यात आली आहे. उर्वरित वाहनधारकांनी वेळेत हे काम पूर्ण केलं नाही, तर डिसेंबरपासून दंडाची कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.
HSRP लावणं आता केवळ नियम नाही, तर जबाबदारी आहे. ३० नोव्हेंबरनंतर उशीर झाल्यास खिशावर परिणाम होणार हे नक्की. त्यामुळे खबरदारी घ्या आणि तुमच्या वाहनावर आजच HSRP प्लेट बसवा.


