
नवी दिल्ली वृत्तसंस्था
वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. फास्टटॅग नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला असून, १५ नोव्हेंबरपासून फास्टटॅग नसलेल्या वाहनांना टोल प्लाझावर दुप्पट टोल शुल्क भरण्याची सक्ती राहणार नाही.
आतापर्यंत, फास्टटॅग नसलेल्या किंवा फास्टटॅग निष्क्रिय असलेल्या वाहनांना टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम रोखीने भरावी लागत होती. मात्र आता नव्या नियमानुसार, रोखीने पैसे भरणाऱ्यांना टोल शुल्काच्या केवळ १.२५ पट रक्कम अदा करावी लागेल. उदाहरणार्थ, टोल शुल्क १०० रुपये असल्यास, यापुढे दुप्पट म्हणजे २०० रुपये भरण्याऐवजी, वाहनचालकाला १२५ रुपयेच भरावे लागतील.
फास्टटॅग प्रणाली कार्यरत असूनही टोल प्लाझावरील यंत्रणा बंद पडल्यास, वैध फास्टटॅग असलेल्या वाहनांना मोफत प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. या बदलामुळे टोल संकलन अधिक पारदर्शक होण्यास आणि रोख व्यवहार कमी होण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, देशातील टोल वसुलीत सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ७,०५२.९१ कोटी रुपये टोल वसूल झाला. ही रक्कम मागील वर्षीच्या ५,६१०.६४ कोटींपेक्षा तब्बल २६ टक्क्यांनी जास्त आहे. मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे ७,०८७.१६ कोटी रुपयांची वसुली झाली होती.
जून महिन्यात उष्णतेमुळे आणि जुलैमध्ये पावसाळ्यामुळे टोल वसुली काहीशी कमी झाली होती. तरीही ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वसुली नोंदवली गेली. वार्षिक फास्टटॅग पास सुरू झाल्याने आणि सणासुदीपूर्वी वाढलेल्या मालवाहतुकीमुळे ही वाढ झाली असल्याचा दावा सरकारने केला आहे.
१५ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या बदलामुळे वाहनचालकांचा प्रवास सुलभ होणार असून, टोल प्रणाली अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.