
नाशिक प्रतिनिधी
मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाशिकचे जिल्हा परिषद शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, आणि कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी या आधी एका शिक्षण संस्थेच्या चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे अधिकारी आरोपी असल्याचे उघड झाले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली असून शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरात शिक्षण क्षेत्र हादरवणारी ही कारवाई ठरली आहे.
शिक्षक भरती घोटाळा हा राज्यभर गाजत असून विविध ठिकाणी त्या संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची राज्यपातळीवर एसआयटी गठित
शिक्षण विभागातील काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला आणि बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचं समोर आलं आहे. त्या माध्यमातून बोगस शिक्षकांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे वेतन अदा करण्यात आले आहे. या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे.
नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. आता त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित 3 गुन्हे दाखल आहेत. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे.