नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या तुटवड्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचे स्पष्टीकरण देत नागरिकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.
Ministry of Petroleum and Natural Gas categorically states that India's petroleum and LPG supply situation is fully secure and under control. All retail fuel outlets have enough supplies. There is no shortage of petrol, diesel, or LPG anywhere in the country. The Ministry calls… pic.twitter.com/nzwb0a4TNR
— ANI (@ANI) March 26, 2026
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशभरातील सर्व पेट्रोल पंप आणि वितरण केंद्रांवर पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही भागात इंधनाची कमतरता नसल्याचेही सरकारने ठामपणे सांगितले. काही ठिकाणी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अशा “दुर्भावनापूर्ण आणि सुनियोजित मोहिमेला” बळी पडू नये, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
देशाकडे ६० दिवसांचा प्रत्यक्ष साठा
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)ने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या सुमारे ६० दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा प्रत्यक्ष साठा उपलब्ध आहे. यामध्ये कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने तसेच भूमिगत गुहांमध्ये साठवलेले सामरिक (Strategic) साठे यांचा समावेश आहे.
याशिवाय भारतीय तेल कंपन्यांनी पुढील ६० दिवसांसाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचे करार आधीच निश्चित केले असल्याने आगामी काळातही इंधन पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
भारताची जागतिक पातळीवरील ताकद
सरकारच्या माहितीनुसार, भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा पेट्रोलियम उत्पादनांचा शुद्धीकरण करणारा देश असून पाचवा सर्वात मोठा निर्यातदार आहे. देशातील रिफायनरी क्षमता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत १५० हून अधिक देशांना शुद्ध इंधनाची निर्यात करतो.
भारत हा पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत निव्वळ निर्यातदार देश असल्याने देशांतर्गत पुरवठा संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले.
देशभरात एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप सुरू
देशभरात सध्या १ लाखांहून अधिक किरकोळ इंधन केंद्रे (पेट्रोल पंप) कार्यरत असून सर्वत्र नियमित पुरवठा सुरू आहे. पुरवठा साखळी सुरळीत चालू असून वाहतूक, वितरण किंवा साठवण व्यवस्थेत कोणताही अडथळा नाही, असे मंत्रालयाने सांगितले.
मध्य-पूर्वेतील तणावाचा परिणाम नाही
मध्य-पूर्वेतील तणावाचा आज २७ वा दिवस सुरू असतानाही भारतातील इंधन पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. परिस्थितीवर केंद्र सरकार सतत लक्ष ठेवून आहे आणि भविष्यातही पुरवठा कायम राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन
केंद्र सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधन तुटवड्याबाबतच्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.


